22 व 23 फेब्रुवारी 2020
महाराष्ट्राला समृद्ध संतसाहित्याची आणि संत जीवनसृष्टीची परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक वातावरणाला या संत परंपरेने ढवळून काढल्याचे दाखले इतिहासात जागोजागी आढळतात, आधुनिक महाराष्ट्रातील अनेक पुरोगामी चळवळीची आणि नवसाहित्याची नाळही संतपरंपरेशी जोडली गेल्याचे दिसते. आजच्या धर्मनिरपेक्षतेच्या पलीकडे जाणाऱ्या संतपरंपरेची ज्योत तेवती ठेवण्याच्या व संतपरंपरा नव्याने समजून घेण्याच्या उद्देशाने दिनांक 22 व 23 फेब्रुवारी 2020 रोजी "महाराष्ट्रातील संत परंपरा " या वैचारिक शिबिराचे आयोजन केले होते. याकाळात डॉ सदानंद मोरे, देवदत्त परुळेकर, सचिन परब व ह भ प श्यामसुंदर सिन्नर महाराज यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ सदानंद मोरे यांनी वारकरी संप्रदायाने सर्व जातीच्या स्त्री पुरुषांना सामावून घेतले आहे, ऋषीं, मुनी, आचार्य व संत या शब्दांचा अर्थ उलगडला, त्यावेळेच्या समाजरचनेतून या संकल्पना कशा येत गेल्या, हे स्पष्ट केले. वारकरी संप्रदायाने जीवन जगण्याच्या पद्धतीतून संत शब्द अस्तित्वात आल्याचे ते म्हणाले, आत्मज्ञान होण्यासाठी कर्म करीत राहण्याचा अर्थ ज्ञानेश्वरीतून सांगितला गेला आहे, मात्र संत ज्ञानेश्वर जेव्हा रागाने ताटीत बसले होते, तेव्हा संत मुक्ताईने त्यांना संतांचा समाजाशी व्यवहार कसा असावा, याचा अर्थ ज्ञानेश्वरांना सांगितला, तसेच संत परंपरेआधीही महानुभव पंथाची विचारधारा वाढू दिली नाही, वास्तविक महानुभव पंथाची समृद्ध परंपरा अधिक खुली झाली असती तर आजची मराठी भाषा अधिक समृद्ध झाली असती, असे मत डॉ सदानंद मोरे यांनी मांडले.
वारकरी संप्रदाय हा एक जातीय व एक धर्मीय नाही तर ही परंपरा अनेक सर्व जातीय व सर्व धर्मीय आहे. पूर्वी 40 मुस्लिम संत व कीर्तनकार होऊन गेले, आज 22 मुस्लिम कीर्तनकार प्रबोधनाचे कार्य करत आहेत. हे वास्तव आहे हे समजून घ्या.
वारकरी कीर्तनाची परंपरा ही चुकीच्या दिशेने जात आहे.
सर्जिकल स्ट्राईक केल्यामुळे आपण मुक्त झालो इथपर्यंत मजल गेलेली आहे. खोट्या कथा सांगून जनतेला भ्रमित केले जात आहे. पाऊस न पडण्याची वैज्ञानिक कारणे न सांगता, यज्ञ न केल्यामुळे पाऊस पडत नाही, म्हणून दुष्काळ पडतो असे सांगणारे कीर्तनकार हे आव्हान आहे.
महाराष्ट्रातील संत परंपरा या वी नीड यू सोसायटीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय शिबिरात ह.भ.प शामसुंदर सोन्नर महाराज "संतपरंपरे समोरील आव्हाने" या सत्रात बोलत होते.
वड, पिंपळ अशी जास्त प्राणवायू देणारी झाडे तोडून यज्ञ करावे लागतात पण याबाबत संत ज्ञानेश्वर म्हणाले त्यानुसार जलाशये निर्माण करा व महावने निर्माण करा हे कीर्तनकार सांगत नाहीत. वारकरी संस्थामधून धर्मांधते विषयी प्रशिक्षण दिले जाते. मनुस्मृतीचे समर्थन संतांनी केले नव्हते पण हेच उघडपणे आज शिकवले जाते.
अहंकार हा शत्रू आहे, पण हाच अहं वारकरी परंपरेचा घात करत आहे. धर्म महत्वाचा आहेच, पण त्यातील अयोग्य परंपरा, विषमता वाढवणाऱ्या गोष्टी तसेच समाजात दूही माजवणार्या विचारा विरोधी काम करण्याची गरज आहे.
ज्ञानदेव हे वारकरी परंपरेचे संस्थापक आहेत पण त्यांचे इंजिनियर आहेत नामदेव महाराज कारण त्यांनी त्याचे कोडिंग केले. सामाजिक भेदांच्या परंपरा नाकारल्या. स्त्री पुरुष समतेचा विचार प्रत्यक्षात आणला. नामदेव महाराजांनी अभंग प्रथम लिहिला व अभंग कसे लिहावेत हे ही त्यांनी पहिल्यांदा लिहून ठेवले.
पहिला विद्रोह तुकाराम महाराजांनी व्यक्त केला. महिलेला विटाळ नसता तर पुरुषांचा जन्म तरी कसा झाला असता? असा जाहीर प्रश्न संत सोयराबाईनी विचारला. महिला पुरुषांपेक्षा खंबीर असतात, व आहेत कारण लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण एकाही शेतकरी महिलेने आत्महत्या केली नाही. हे बळ तीला वारकरी परंपरेने दिले आहे. पण आज ज्यांच्या हातात ही परंपरा आहे, त्यांनी यू टर्न घेतला आहे. प्रचारकी व खोटे वारकरी व कीर्तनकार ओळखून त्यांना उघडे पाडणे गरजेचे आहे हे मोठे आव्हान आहे. त्यास एकत्रित सामोरे जावे लागेल हे काम आपणास करावे लागेल. त्याशिवाय पर्याय नाही.
दुसऱ्या सत्रात "धर्माची स्पेस व परिवर्तनवादी चळवळीची भूमिका काय असावी " या विषयावर श्री.देवदत्त परुळेकर यांनी, त्यांची पार्श्वभूमी सांगितली. एका चर्चेत डॉ.यशवंत सुमंत यांनी एक सूत्र सांगीतले की, "जेथे लोक जमतात तेथे तेथे राजकारण जन्माला येते" त्यामुळे समाजाची मानसिकता कळलेली नसेल तर परिवर्तन कसे करणार? हा प्रश्न सतावू लागला, त्यातून चिंतन करत करत या विचारापर्यत आलो की धर्म साहित्य वाचले पाहीजे. संत साहित्याने एक नवी दिशा दिली. परंपरागत, सनातनी धर्माच्या व समाजात दूही माजवणार्या सर्व विचारांना संतांनी अमान्य केले व जनतेचे प्रबोधन केले.
म.गांधींनी धर्म मानला, ते स्वतःला सनातनी हिंदू म्हणत, पण त्यांनी धर्माची स्पेस परंपरावाद्यांना वापरू दिली नाही. हे आपण समजून घेतली नाही. त्यांनी सामान्य जनतेच्या मनात असलेली धर्म व भावना दोन्ही समजून घेतली त्यामुळे सर्व धर्मीय जनता त्यांच्या मागे आली.
देव व धर्म ही व्यक्तीची मानसिक गरज आहे. यातून आलेली कर्मकांड नाकारत असताना नवीन परंपरा निर्माण करावी लागते. त्याशिवाय जुनी कर्मकांड सोडून नवीन परंपरेस मान्यता मिळत नाही. या नवीन परंपरा समतेच्या असाव्यात असा प्रयत्न करू या.
व्यक्ती नास्तिक असू शकते पण समाज नास्तिक असू शकत नाही.केवळ तर्काने व्यक्ती दुःखावर मात करू शकत नाही. म्हणून भावनेचा ओलावा असलेली नवीन परंपरा निर्माण केली पाहीजे. जे व्यक्तीचे तेच समुहाचे असते. हे समजून घेऊन नवे नाते निर्माण करा. तर परिवर्तनाच्या बाजूने समूहास उभे करणे सोपे होईल. आपले उद्दिष्ट काय आहे १) समाजाला धर्माविरुद्ध वा धर्मापलीकडे नेणे की २) समाजात माणसा माणसात असलेले विषमतेचे विचार संपवून एक नवा समतावादी समाज निर्माण करणे. आपले उद्दिष्ट दोन नंबरचे असेल तर संवादाची माध्यमे बदलावी लागतील.
परिवर्तनासाठी आपण लवचिक असले पाहिजे, लोकांना समजेल अशा भाषेत व तंत्रज्ञानाचा उपयोग करून संवाद केला व संवाद झाला, त्यानंतर समूहांनी कार्यकर्त्याला स्वीकारले तरच परिवर्तन शक्य आहे हे लक्षात घ्या. लोकांच्या सामूहिक शहाणपणावर विश्वास ठेवावा लागेल. नवीन प्रयोग करावे लागतील.